ترجمة سورة النّور

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة النّور باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. ही आहे ती सूरह (अध्याय) जी आम्ही अवतरित केली आहे आणि निर्धारित केली आहे आणि ज्यात आम्ही स्पष्ट आदेश अवतरित केले आहेत, यासाठी की तुम्ही स्मरणात राखावे.
२. व्यभिचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी प्रत्येकाला शंभर कोडे मारा. त्यांना अल्लाहच्या (दंड) नियमानुसार शिक्षा देताना तुम्हाला कदापी कीव वाटू नये, जर तुम्ही अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असाल. त्यांना शिक्षा देतेवेळी ईमान राखणाऱ्यांचा एक समूह हजर असला पाहिजे.
३. व्यभिचारी पुरुष, व्यभिचारी स्त्री किंवा अनेकेश्वरवादी स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीशी विवाह करीत नाही आणि व्यभिचार करणारी स्त्री देखील, व्यभिचारी पुरुष किंवा अनेकेश्वरवादी पुरुषाखेरीज दुसऱ्याशी विवाह करीत नाही आणि ईमान राखणाऱ्यांवर हे हराम (अवैध) केले गेले आहे.
४. आणि जे लोक पावित्र्यशील स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील, मग चार साक्षी सादर करू शकत नसतील तर त्यांना ऐंशी कोडे मारा आणि त्यांची साक्ष कधीही मान्य करू नका, हे दुराचारी लोक आहेत.
५. परंतु जे लोक यानंतर माफी मागून आपला सुधार करून घेतील, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा आणि दया- कृपा करणारा आहे.
६. आणि जे लोक आपल्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील आणि त्यांचा साक्षी त्यांच्याखेरीज दुसरा कोणी नसेल तर अशा लोकांपैकी प्रत्येकाचा पुरावा हा आहे की त्यांनी चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की ते सच्चा लोकांपैकी आहेत.
७. आणि पाचव्या खेपेस हे की अल्लाहतर्फे धिःक्कार असो त्याचा, जर तो खोट्यांपैकी असेल.
८. आणि त्या (स्त्री) वरून शिक्षा अशा प्रकारे टाळली जाऊ शकते की तिने चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन म्हणावे की निःसंशय तिचा पती खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे.
९. आणि पाचव्या खेपेस म्हणावे की तिच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो जर तिचा पती सत्य बोलणाऱ्यांपैकी असेल.
१०. आणि जर अल्लाहची दया- कृपा तुमच्यावर नसती (तर तुमच्यावर दुःख कोसळले असते) आणि अल्लाह क्षमा-याचना कबूल करणारा हिकमतशाली आहे.
११. जे लोक हा फार मोठा आक्षेप रचून आले आहेत. हा देखील तुमच्यातला एक समूह आहे. तुम्ही त्याला आपल्याकरिता वाईट समजू नका किंबहुना हा तुमच्यासाठी चांगला आहे. मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकावर तेवढा अपराध आहे, जेवढा त्याने कमविला आहे आणि त्यांच्यापैकी ज्याने त्यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे, त्याची शिक्षाही फार मोठी आहे.
१२. ते ऐकताच ईमान राखणाऱ्या पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकमेकांबद्दल सद्‌भावना का नाही केली आणि असे का नाही म्हटले की हा तर उघड आरोप आहे.
१३. त्यांनी यावर चार साक्षी का नाही आणले? आणि ज्याअर्थी त्यांनी साक्षी आणले नाहीत तर हा आरोप ठेवणारे लोक निश्चितच अल्लाहजवळ केवळ खोटारडे आहेत.
१४. आणि जर तुमच्यावर अल्लाहची कृपा आणि दया, या जगात आणि आखिरतमध्ये नसती तर निःसंशय, ज्या गोष्टीची चर्चा तुम्ही सुरू केली होती, तिच्यापायी तुम्हाला फार मोठी शिक्षा पोहचली असती.
१५. जेव्हा तुम्ही आपल्या मुखाने याची चर्चा सतत करू लागले आणि आपल्या तोंडाने ती गोष्टही बोलू लागले, जिच्याविषयी तुम्हाला काहीच ज्ञान नव्हते. तुम्ही तिला साधारण गोष्ट समजत राहिले असले तरी अल्लाहच्या दृष्टीने ती मोठी भयंकर बाब होती.
१६. आणि तुम्ही ती गोष्ट ऐकताच असे का नाही म्हटले की आम्ही अशी गोष्ट तोंडाने काढणेही चांगले नाही. हे अल्लाह तू पवित्र आहेस हा तर फार मोठा मिथ्यारोप आहे.
१७. अल्लाह तुम्हाला उपदेश करतो की पुन्हा कधी असे काम करू नका, जर तुम्ही सच्चे ईमानधारक असाल.
१८. आणि अल्लाह तुमच्यासमोर आपल्या आयती निवेदन करीत आहे, आणि अल्लाह जाणणारा, बुद्धीकौशल्य बाळगणारा आहे.
१९. जे लोक, ईमान राखणाऱ्यांमध्ये निर्लज्जता पसरविण्याची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी या जगात आणि आखिरतमध्ये दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे,१ आणि अल्लाह सर्व काही जाणतो, आणि तुम्ही काहीच जाणत नाही.
____________________
(१) ‘फाहिशत’चा अर्थ आहे निर्लज्जता आणि पवित्र कुरआनने व्यभिचार कृत्याला निर्लज्जता म्हटले आहे. (बनी इस्राईल) आणि इथे व्यभिचाराच्या एका खोट्या बातमीच्या प्रचारालाही अल्लाहने निर्लज्जता म्हटले आहे आणि यास इहलोक आणि परलोकाच्या दुःखदायक शिक्षेचे कारण सांगितले आहे. ज्याद्वारे असभ्यता (निर्लज्जता) विषयी इस्लामचा स्वभाव आणि अल्लाहच्या मर्जीचे अनुमान होते की केवळ असभ्य गोष्टीची खोटी बातमी पसरविणे अल्लाहच्या दृष्टीने किती मोठा अपराध आहे. तेव्हा जे लोक रात्रंदिवस एका इस्लामी समाजात वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाद्वारे असभ्यतेचा, निर्लज्जतेचा सर्रास प्रचार करीत आहेत आणि घरोघरी ते पोहोचवित आहेत, तर अल्लाहच्या येथे हे लोक केवढे मोठे अपराधी ठरतील?
२०. आणि जर तुमच्यावर अल्लाहची दया- कृपा राहिली नसती आणि हेही की अल्लाह अतिशय स्नेहशील दया करणारा आहे (अन्यथा तुमच्यावर प्रकोप आला असता).
२१. हे ईमान राखणाऱ्यांनो! सैतानाच्या पाऊलखुणांवर चालू नका, जो मनुष्य सैतानाच्या पाऊलखुणांवर चालेल, तर तो निर्लज्जता आणि वाईट कामांचाच आदेश देईल आणि जर अल्लाहची दया- कृपा तुमच्यावर नसती तर तुमच्यापैकी कोणीही, कधीही स्वच्छ- शुद्ध झाला नसता. परंतु अल्लाह ज्याला पाक (स्वच्छ-शुद्ध) करू इच्छितो, करतो. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.
२२. आणि तुमच्यापैकी जे लोक मोठे आणि संपन्न अवस्था राखणारे आहेत त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपल्या जवळच्या नातेवाईकांची आणि गोरगरिबांची आणि अल्लाहच्या मार्गात देशत्याग करणाऱ्यांची मदत करणार नाही, किंबहुना माफ केले पाहिजे आणि तहे दिल पाहिजे. काय तुम्ही नाही इच्छित की अल्लाहने तुमचे अपराध (चुका) माफ करावेत. आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
२३. जे लोक सत्शील भोळ्या-भाबड्या ईमानधारक स्त्रियांवर आरोप ठेवतात, ते या जगात आणि आखिरतमध्ये धिःक्कारले जाणारे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी अतिशय कठोर शिक्षा-यातना आहे.
२४. जेव्हा त्यांच्या समक्ष त्यांच्या जीभा आणि त्यांचे हात-पाय, त्यांनी केलेल्या कर्मांची साक्ष देतील.
२५. त्या दिवशी अल्लाह त्यांना पुरेपूर मोबदला सत्य आणि न्यायासह प्रदान करेल आणि ते जाणून घेतील की अल्लाहच सत्य आहे, तोच जाहीर करणारा आहे.
२६. अशुद्ध घाणेरड्या स्त्रिया अशुद्ध घाणेरड्या पुरुषांच्या योग्य आहेत, आणि अशुद्ध घाणेरडे पुरुष अशुद्ध घाणेरड्या स्त्रियांच्या योग्य आहेत, आणि स्वच्छ- शुद्ध स्त्रिया, स्वच्छ- शुद्ध पुरुषांच्या लायक आहेत आणि स्वच्छ- शुद्ध पुरुष स्वच्छ- शुद्ध स्त्रियांच्या योग्य आहेत. अशा पवित्र, स्वच्छ- शुद्ध लोकांविषयी जी काही वाह्यात बडबड हे (आरोप ठेवणारे) करीत आहेत, ते त्यापासून निर्दोष आहेत. त्यांच्यासाठी क्षमा आहे, आणि मोठी सन्मानपूर्ण आजिविका आहे.
२७. हे ईमान राखणाऱ्यांनो आपल्या घरांखेरीज दुसऱ्यांच्या घरात जाऊ नका, जोपर्यंत (आत येण्याची) परवानगी न घ्याल आणि तिथल्या राहणाऱ्यांना सलाम न कराल. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे, यासाठी की तुम्ही बोध प्राप्त करावा.
२८. जर तिथे तुम्हाला कोणी भेटला नाही तर मग अनुमती घेतल्याविना आत जाऊ नका, आणि जर तुम्हाला परत जायला सांगितले गेले तर तुम्ही परतच जा. हेच तुमच्यासाठी अधिक निर्मळ, निष्पाप आहे. जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
२९. परंतु ज्यात लोक राहत नसतील, अशा घरांमध्ये, जिथे तुमचा काही लाभ किंवा सामुग्री असेल (त्यात) प्रवेश करण्यात काही अपराध नाही. तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपविता अल्लाह ते सर्व काही जाणतो.
३०. ईमान राखणाऱ्या पुरुषांना सांगा की आपली नजर खाली राखावी आणि आपल्या लज्जास्थाना (गुप्तांगा) चे रक्षण करावे. यातच त्यांच्याकरिता पावित्र्य आहे. लोक जे काही करीत आहेत, अल्लाह ते सर्व काही जाणतो.
३१. आणि ईमान राखणाऱ्या स्त्रियांना सांगा की त्यांनीही आपली नजर झुकलेली ठेवावी आणि आपल्या शील-अब्रुचे रक्षण करावे. आणि आपल्या शोभा- सजावटी (शृंगारा) ला उघड करू नये. त्याच्याखेरीज जे उघड आहे, आणि आपल्या छातीवर आपल्या ओढण्या- दुपट्टे पूर्णतः पसरवून राखावेत आणि आपला शृंगार कोणाच्याही समोर जाहीर करू नये खेरीज आपल्या पतीच्या किंवा आपल्या पित्याच्या किंवा आपल्या सासऱ्याच्या, किंवा आपल्या पुत्राच्या किंवा आपल्या पतीच्या पुत्रांच्या, किंवा आपल्या भावांच्या किंवा पुतण्यांच्या किंवा आपल्या भाच्यांच्या, किंवा आपल्या सखींच्या किंवा दासांच्या किंवा नोकरांपैकी अशा पुरुषांच्या ज्यांना कामवासना नसावी, किंवा अशा लहान मुलांच्या, जे स्त्रियांच्या गुप्त बाबींशी अद्याप परिचित झाले नसावेत, आणि अशा प्रकारे त्यांनी आपले पाय (जमिनीवर) जोरजोराने आपटत चालू नये की (तशाने) त्यांचा लपलेला शृंगार कळून यावा. आणि हे ईमान राखणाऱ्यांनो, तुम्ही सर्वच्या सर्व अल्लाहच्या दरबारात माफी मागा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करावी.
३२. आणि तुमच्यापैकी जे पुरुष-स्त्री तारुण्यास पोहोचले असतील तर त्यांचा विवाह करून द्या आणि आपल्या नेक सदाचारी दास-दासींचा देखील जर ते गरीबही असतील तर अल्लाह आपल्या दया कृपेने त्यांना धनवान बनविल. अल्लाह मोठी विशालता बाळगणारा आणि ज्ञान राखणारा आहे.
३३. आणि त्या लोकांनी सत्शील राहिले पाहिजे, जे आपला विवाह करण्याचे सामर्थ्य बाळगत नाही. येथेपर्यंत की अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना धनवान करावे. तुमच्या दासांपैकी जो कोणी तुम्हाला (दास्यमुक्त होण्याकरिता) काही देऊन मुक्तीचा लेखी करार करू इच्छितील तर तुम्ही त्यांना तसा लेखी करार लिहून द्या. जर तुम्हाला त्यांच्यात काही भलेपणा दिसत असेल, आणि अल्लाहने जी धन-संपत्ती तुम्हाला देऊन ठेवली आहे, तिच्यातून त्यांनाही द्या. तुम्ही आपल्या त्या दासींना, ज्या सत्शील (पवित्र) राहू इच्छितात त्यांना ऐहिक जीवनाच्या फायद्यासाठी दुष्कर्म करण्यास विवश करू नका आणि जो त्यांना विवश करील तर त्यांना विवश केले गेल्यावर अल्लाह (त्यांच्यासाठी) क्षमाशील आणि दयाशील आहे.
३४. आणि आम्ही तुमच्याकडे स्पष्ट आयती अवतरित केल्या आहेत आणि त्या लोकांची उदाहरणे जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत. आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता बोध- उपदेश.
३५. अल्लाह आकाशांचा आणि जमिनीचा नूर (प्रकाश) आहे. त्याच्या नूरचे उदाहरण असे की जणू एखाद्या कोनाड्यात दिवा आहे आणि तो दिवा काचेच्या (कंदीलाच्या) आत असावा. काच चकाकताना, लख्ख चमकणाऱ्या ताऱ्यासमान असावा आणि तो दिवा पवित्र वृक्ष जैतूनच्या तेलाने प्रज्वलित केला जात असावा, जो वृक्ष ना पूर्वेकडचा आहे, ना पश्चिमेकडचा आणि ते तेल प्रकाशमान होण्याच्या बेतात असावे आगीने त्याला कधी स्पर्श केला नसला तरी. प्रकाशावर प्रकाश आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या नूरच्या दिशेने ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो. लोकांना समजावण्याकरिता अल्लाह हे उदाहरण देत आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीची अवस्था चांगल्या प्रकारे जाणतो.
३६. त्या घरांमध्ये, ज्यांना उंचविण्याचा आणि तिथे आपले नामःस्मरण करण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे तिचे सकाळ-संध्याकाळ अल्लाहची तस्बीह (गुणगान) करीत असतात.
३७. असे लोक ज्यांना त्यांचा व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून आणि नमाज कायम करण्यापासून व जकात अदा करण्यापासून गाफील करीत नाही, त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्या दिवशी अनेक हृदये आणि अनेक डोळे उलथे-पालथे होतील.
३८. या हेतुने की अल्लाहने त्यांना त्यांच्या कर्माचा चांगला मोबदला द्यावा आणि आपल्या कृपेने काही जास्तच प्रदान करावे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह ज्याला इच्छितो अगणित रोजी (आजिविका) प्रदान करतो.
३९. आणि काफिर (इन्कारी) लोकांचे कर्म त्या चकाकणाऱ्या वाळूसारखे आहे जी खुल्या मैदानात असावी. जिला तहानलेला मनुष्य दुरून पाणी समजतो, परंतु जेव्हा तो त्याजवळ पोहचतो, तेव्हा त्याला काहीच आढळत नाही, तथापि अल्लाह आपल्या निकट असल्याचे आढळते, जो त्याचा हिशोब पुरेपूर चुकता करतो. आणि अल्लाह लवकरच हिशोब चुकता करणारा आहे.
४०. किंवा त्या अंधारांसारखे आहे जे खूप खोल समुद्रात असावेत, ज्याला लाटेवर लाट झाकत असावी, मग त्यावर ढग पसरले असावेत. अर्थात अंधारावर अंधार असावा. जर आपला हात बाहेर काढील तर तोही पाहणे त्याला शक्य नसावे, आणि (वस्तुतः) ज्याला अल्लाहनेच नूर न द्यावा त्याच्याजवळ कोणताही नूर (प्रकाश) नसतो.
४१. काय तुम्ही नाही पाहिले की आकाश आणि धरतीची समस्त ईशनिर्मिती आणि पंख पसरून उडणारे सर्व पक्षी अल्लाहीच तस्बीह (नामस्मरण )(गुणगान) करण्यात मग्न आहेत. प्रत्येकाची नमाज आणि तस्बीह (नामस्मरण) त्याला माहीत आहे आणि लोक जे काही करतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.१
____________________
(१) अर्थात आकाश व जमिनीवर निवास करणारे, ज्या प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन आणि प्रशंसा करतात, ते सर्व तो जाणतो. ही समस्त मानव आणि जिन्नांना चेतावणी आहे की अल्लाहने तुम्हाला बुद्धी आणि विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे, तेव्हा तुम्ही इतर निर्मितीच्या तुलनेत अधिक ईश-स्तुती व महिमागान केले पाहिजे. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट आहे. अल्लाहची इतर निर्मिती तर अल्लाहचे गुणगान करण्यात मग्न आहे परंतु बुद्धी आणि प्रज्ञेने सुशोभित असलेली ही ईशनिर्मिती याबाबत सुस्त आहे ज्याबद्दल खात्रीने अल्लाहच्या पकडीस पात्र ठरतील.
४२. आकाशांची आणि धरतीची राज्यसत्ता अल्लाहचीच आहे आणि अल्लाहच्याचकडे परतून जायचे आहे.
४३. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह ढगांना चालवितो, मग त्यांना आपसात मिळवतो, मग त्यांना थरावर थर करतो. मग तुम्ही पाहता की त्यांच्यामधून पाऊस पडतो. तोच आकाशाकडून गारांच्या पर्वतातून गारा वर्षवितो. मग ज्यांना इच्छितो त्यांना त्यांच्याजवळ वर्षवितो आणि ज्यांच्यापासून इच्छितो त्यांच्यापासून त्यांना हटवितो. ढगांमधूनच निघणाऱ्या विजेची चमक अशी असते की जणू आता डोळ्यांची नजर हिरावून घेईल.
४४. अल्लाहच दिवस-रात्रीचा उलटफेर करत राहतो. डोळे (दृष्टी) राखणाऱ्यांकरिता यात निश्चितच मोठा बोध आहे.
४५. समस्त चालणाऱ्या फिरणाऱ्या सजीवाला अल्लाहने पाण्याद्वारे निर्माण केले आहे. त्यातले काही आपल्या पोटाच्या आधारे (सरपटत) चालतात, काही दोन पायांवर चालतात, काही चार पायांवर चालतात. अल्लाह जे इच्छितो निर्माण करतो. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य बाळगतो.
४६. निःसंशय, आम्ही स्पष्ट आयती अवतरित केल्या आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो सरळ मार्ग दाखवितो.
४७. आणि जे म्हणतात की आम्ही अल्लाह आणि रसूल (स.) वर ईमान राखले आणि आज्ञाधारक झालोत, मग त्यांच्यातला एक समूह त्यानंतरही तोंड फिरवितो, हे ईमान राखणारे नाहीत.१
____________________
(१) हे दांभिक (मुनाफिक) लोकांचे निवेदन आहे, जे तोंडाने इस्लाम जाहीर करीत, परंतु मनात अविश्वास आणि द्वेष- मत्सर राखत. अर्थात खऱ्या ईमानापासून वंचित होते. यास्तव तोंडाने ईमान व्यक्त केल्यानंतरही, त्यांच्या ईमानाचा इन्कार केला गेला आहे.
४८. आणि जेव्हा यांना या गोष्टीकडे बोलाविले जाते की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने (त्यांच्या तंट्याचा) फैसला करावा, तरी देखील त्यांचा एक समूह तोंड फिरविणारा बनतो.
४९. आणि जर हक्क त्यांनाच पोहचत असेल तर पैगंबराजवळ मोठे आज्ञाधारक बनून येतात.
५०. काय त्यांच्या मनात रोग आहे? किंवा हे शंका-संशयात पडले आहेत? किंवा त्यांना या गोष्टीचे भय आहे की अल्लाह आणि त्याचा रसूल त्यांचा हक्क नष्ट न करून टाकावेत. वस्तुतः हे स्वतः मोठे अत्याचारी आहेत.
५१. ईमान राखणाऱ्यांचे म्हणणे तर असे आहे की जेव्हा त्यांना यासाठी बोलाविले जाते की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने त्यांच्या दरम्यान फैसला करून द्यावा तेव्हा ते म्हणतात की आम्ही ऐकले आणि मान्य केले. हेच लोक सफल होणारे आहेत.
५२. आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे अनुसरण करील, अल्लाहचे भय राखील, (त्यांच्या शिक्षा- यातनेचे) भय बाळगून राहील तर तेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत.
५३. आणि अगदी दृढतापूर्वक ते अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की तुमचा आदेश होताच तत्पर निघण्यास सज्ज होऊ. त्यांना सांगा, पुरे, शपथ घेऊ नका. तुमच्या आज्ञापालना (ची हकीगत) माहीत आहे. जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते जाणतो.
५४. सांगा, अल्लाहच्या आदेशाचे पालन करा, पैगंबरांचे आज्ञापालन करा, तरीही जर तुम्ही तोंड फिरविले तर पैगंबराचे कर्तव्य तर तेच आहे, जे त्याच्यावर अनिवार्य केले गेले आहे आणि तुमच्यावर त्या गोष्टीची जबाबदारी आहे, जी तुमच्यावर टाकली गेली आहे. मार्गदर्शन तर तुम्हाला त्याच वेळी लाभेल, जेव्हा पैगंबरांचे आज्ञापालन स्वीकार कराल. (ऐका) पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टतः पोहचविणे आहे.
५५. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ईमान राखले आहे आणि सत्कर्म केले आहे, अल्लाहने त्यांच्याशी वायदा केलेला आहे की तो त्यांना धरतीवर सत्ताधिकार प्रदान करील, ज्या प्रकारे त्या लोकांना प्रदान केला होता, जे यांच्यापूर्वी होऊन गेले आणि निःसंशय त्यांच्यासाठी त्यांच्या या धर्माला दृढतापूर्वक कायम करील ज्यास त्याने त्यांच्यासाठी पसंत केले आहे आणि त्यांच्या भय- दहशतीला, शांती सुबत्तेत बदलून टाकील. ते माझी उपासना करतील, माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करणार नाहीत. त्यानंतरही जे लोक कृतघ्न बनतील आणि कुप्र (इन्कार) करतील तर निश्चित ते अवज्ञाकारी आहेत.
५६. आणि नमाज कायम करा, जकात अदा करा आणि अल्लाहच्या पैगंबराचे आज्ञापालन करीत राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.
५७. तुम्ही असे कधीही समजू नका की काफिर (इन्कारी) लोक धरतीवर (सर्वत्र पसरून) आम्हाला पराभूत करतील. त्यांचे मूळ ठिकाण तर जहन्नम आहे जे निःसंशय मोठे वाईट ठिकाण आहे.
५८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या ताब्यात असलेल्या दासांनी आणि त्यांनीही जे तुमच्यापैकी पूर्ण वयास पोहोचले नसतील (आपल्या येण्याच्या) तीन वेळांमध्ये तुमच्याकडून अनुमती घेणे आवष्यक आहे. फज्र (प्रातःकालीन) च्या नमाजपूर्वी आणि जोहर (मध्यान्ह) च्या वेळी जेव्हा तुम्ही आपले कपडे उतरवून ठेवता आणि ईशा (रात्री) च्या नमाजनंतर, या तिन्ही वेळा तुमच्या (एकांत) आणि पडद्याच्या आहेत. या वेळांखेरीज, ना तुमच्यावर काही दोष आहे, ना त्यांच्यावर. तुम्ही सर्व आपसात जास्त करून एकमेकांच्या जवळ येणे-जाणे करणारे आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपले आदेश अगदी स्पष्ट करून सांगत आहे आणि अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे.
५९. आणि तुमच्यापैकी जी मुले तरुण (जाणत्या) वयास पोहचतील तर ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीचे (मोठे) लोक अनुमती मागतात, त्यांनी देखील अनुमती घेऊन आले पाहिजे. अल्लाह अशा प्रकारे तुम्हाला आपल्या आयती स्पष्टतः सांगतो. अल्लाहच जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे.
६०. आणि मोठ्या म्हाताऱ्या स्त्रिया, ज्यांना आपल्या विवाहाची आशा (आणि इच्छा) च राहिली नसावी, त्या जर आपले कपडे (पडद्यासाठी वापरलेले) उतरवून ठेवतील तर त्यांच्यावर काही दोष नाही (मात्र या अटीवर) की त्या आपली शोभा- सजावट दाखविणाऱ्या नसाव्यात. तथापि त्यांच्यासाठी हेच अधिक चांगले आहे की त्यांनी यापासून अलिप्त राहावे. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे.
६१. आंधळ्याला, पांगळ्याला, रोग्याला आणि स्वतः तुम्हाला कधीही कसलीही हरकत नाही की तुम्ही आपल्या घरी, मावशा किंवा आपल्या पित्याच्या घरी किंवा आपल्या मातांच्या घरी किंवा आपल्या भावांच्या घरी किंवा आपल्या बहीणींच्या घरी किंवा आपल्या चुलत्यांच्या घरी किंवा आपल्या आत्यांच्या घरी किंवा आपल्या मामांच्या घरी किंवा आपल्या मावशींच्या घरी किंवा त्या घरांमध्ये, ज्यांच्या किल्ल्या तुमच्या मालकीच्या असाव्यात किंवा आपल्या मित्रांच्या घरी, तुमच्यावर यातही काही गुन्हा नाही की तुम्ही सर्व एकत्र बसून जेवण घ्यावे किंवा वेगवेगळे बसून परंतु जेव्हा तुम्ही घरांमध्ये प्रवेश करू लागाल तेव्हा आपल्या घरच्या लोकांना सलाम करीत जा. शुभ कामना आहे, जी मंगलप्रद आणि पवित्र अल्लाहतर्फे अवतरित आहे. अशा प्रकारे अल्लाह, आपले आदेश तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.
६२. ईमान राखणारे लोक तर तेच आहेत जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखतात, आणि जेव्हा अशा समस्येत, लोकांनी एकत्र होण्याची आवश्यकता असते पैगंबरांसोबत असतात, तेव्हा जोपर्यंत तुमच्याकडून अनुमती घेत नाहीत, कोठेही जात नाहीत. जे लोक (अशा प्रसंगी) तुमच्याकडून अनुमती घेतात, वास्तिवक ते हेच लोक होत, ज्यांनी अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखलेले आहे. तेव्हा असे लोक जेव्हा तुमच्याकडून आपल्या एखाद्या कामाकरिता अनुमती (परवनागी) मागतील तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी ज्याला इच्छित असाल अनुमती द्या आणि त्यांच्यासाठी अल्लाहजवळ माफीची प्रार्थना करा. निःसंशय, अल्लाह माफ करणारा, दया कृपा करणारा आहे.
६३. तुम्ही (अल्लाहच्या) पैगंबराच्या बोलिवण्यास असे सर्वसाधारण बोलिवणे समजू नका जसे आपसात एकमेकांचे असते. तुमच्यापैकी अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो जे नजर टाळून गुपचूप निघून जातात. (ऐका) जे लोक पैगंबराच्या आदेशाचा विरोध करतात त्यांनी भय बाळगून राहावे की कदाचित त्यांच्यावर एखादा फार मोठा उपद्रव (फितना) येऊन न कोसळावा किंवा त्याच्यावर एखादा दुःखाचा आघात न व्हावा.१
____________________
(१) या संकटाशी अभिप्रेत हृदयांची ती वक्रता होय, जी माणसाला ईमानापासून वंचित ठेवते. हा पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशांची अवज्ञा आणि त्यांचा विरोध करण्याचा परिणाम आहे आणि ईमानापासून वंचित होऊन कुप्र (इन्कार, अविश्वासा) वर जीवनाचा अंत, जहन्नमची निरंतर यातना इ. गोष्टींचे कारण बनते जसे आयतीच्या पुढील वाक्यात फर्माविले. यास्तव पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचे शुभ आचरण आणि सुन्नत (चरित्रा) ला प्रत्येक क्षणी दृष्टीपथात राखावे, यास्तव जे कथन आणि कर्म त्याला अनुसरून असेल तेच अल्लाहच्या दरबारात स्वीकृत आणि इतर सर्व अस्वीकृत ठरेल. पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ‘मनफइला फआला लमसा फलमीहिल कुरआना फहुदुद.’ म्हणजे ‘‘ज्याने असे कर्म केले जे आमच्या आदेशाला अनुसरून नाही ते व्यर्थ आहे.’’ (अलबुखारी, किताबुस्सुलह बाब इज़ा स्तलहु अला सुलहे जौरीन आणि मुस्लिम, किताबुल अकिजया बाब नक़़जिल अहकामिल बातिला व रद्दि मुहदसातिल उमूर व सुन्नन)
६४. जाणून घ्या की आकाशांत आणि धरतीवर जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे, ज्या मार्गावर तुम्ही आहात, तो मार्ग अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो आणि ज्या दिवशी हे सर्व त्याच्याकडे परतविले जातील, त्या दिवशी त्यांना त्यांच्या कृतकर्मांशी अवगत करविल आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.
Icon