ترجمة سورة الأحقاف

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الأحقاف باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. हा मीम.
२. या ग्रंथाला अवतरित करणे, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे आहे.
३. आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्या दोघांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना अति उत्तम योजनेसह निर्धारित अवधीकरिता बनविले आहे आणि काफिर लोकांना ज्या गोष्टीचे भय दाखविले जाते तिच्यापासून तोंड फिरवितात.
४. (तुम्ही) सांगा की, बरे ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, मलाही दाखवा की त्यांनी जमिनीचा कोणता हिस्सा बनविला आहे किंवा आकाशांमध्ये त्यांचा कोणता हिस्सा आहे? जर तुम्ही सच्चे असाल तर याच्या पूर्वीचाच एवादा ग्रंथ किंवा एखादे ज्ञान, जे उद्‌धृत केले जात असेल, माझ्याजवळ आणा.
५. आणि त्याहून जास्त मार्गभ्रष्ट दुसरा कोण असेल, जो अल्लाहखेरीज अशांना पुकारतो, जे कयामतपर्यंत त्याची दुआ - प्रार्थना कबूल करू शकणार नाहीत, उलट त्याच्या पुकारण्यापासून गाफीलच असावेत.
६. आणि जेव्हा लोकांना एकत्र केले जाईल, तेव्हा हे त्यांचे वैरी होतील आणि यांच्या उपासनेचा साफ इन्कार करतील.
७. आणि जेव्हा त्यांना आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा काफिर लोक सत्य गोष्टीस, जेव्हा ती त्यांच्याप्रत येऊन पोहोचली, सांगतात की ही तर उघड जादू आहे.
८. काय ते असे म्हणतात की ते तर त्याने स्वतः बनविले आहे. (तुम्ही) सांगा की जर मीच ते बनवून आणले आहे तर तुम्ही माझ्यासाठी अल्लाहतर्फे कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही. तुम्ही या कुरआनाविषयी जे काही सांगत ऐकत आहात, ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. माझ्या आणि तुमच्या दरम्यान साक्ष देण्यास तोच पुरेसा आहे आणि तो मोठा माफ करणारा, मोठा दयावान आहे.
९. (तुम्ही) सांगा की मी काही अगदी नवीन पैगंबर तर नाही आणि ना मला हे माहीत की माझ्याशी व तुमच्याशी कसा व्यवहार केला जाईल. मी तर फक्त त्याच गोष्टीचे अनुसरण करतो, जी माझ्याकडे वहयी केली जाते आणि मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे.
१०. (तुम्ही) सांगा की जर हा कुरआन अल्लाहतर्फे असेल आणि तुम्ही त्यास मान्य केले नसेल आणि इस्राइलच्या संततीचा एक साक्षी त्यासारखी साक्षही देऊन चुकला असेल आणि त्याने ईमानही राखले असेल आणि तुम्ही विद्रोह केला असेल तर निःसंशय, अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
११. आणि काफिर (इन्कारी) लोक ईमान राखणाऱ्यांविषयी म्हणाले की जर हा (धर्म) चांगला असता तर हे लोक त्याच्याकडे आमच्या आधी जाऊ शकले नसते आणि ज्याअर्थी त्यांनी कुरआनापासून मार्गदर्शन प्राप्त केले नाही, तेव्हा असे म्हणतील की हे जुने असत्य आहे.
१२. आणि याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ मार्गदर्शक व दया म्हणून होता, आणि हा ग्रंथ त्याचे सत्य-समर्थन करणारा आहे अरबी भाषेत, यासाठी की अत्याचारी लोकांना भय दाखवावे आणि अल्लाहचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी शुभ समाचार ठरावा.
१३. निःसंशय, ज्या लोकांनी सांगितले की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे, मग त्यावर अटळ राहिलेत तर अशा लोकांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील.
१४. हे तर जन्नतमध्ये जाणारे लोक आहेत, जे सदैव तिच्यातच राहतील, त्या कर्मांच्या मोबदल्यात जे ते करीत होते.
१५. आणि आम्ही माणसाला, आपल्या माता-पित्याशी सद्‌वर्तन करण्याचा आदेश दिला आहे. त्याच्या मातेने त्याला कष्ट-यातना झेलून उदरात ठेवले आणि यातना सहन करून त्याला जन्म दिला.१ त्याची गर्भधारणा आणि त्याचे दूध सोडविण्याची मुदत तीस महिन्यांची आहे.येथेपर्यर्ंत की जेव्हा तो आपल्या पूर्ण वयास (तरुण वयास) आणि चाळीस वर्षांच्या वयास पोहचला, तेव्हा म्हणू लागला, हे माझ्या पालनकर्त्या! मला तौफीक (सुबुद्धी) दे की मी तुझ्या त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकावे, जी तू मला आणि माझ्या माता-पित्यास प्रदान केली आहे आणि हे की मी अशी सत्कर्मे करावीत, ज्यांनी तू प्रसन्न व्हावे आणि तू माझ्या संततीलाही नेक सदाचारी बनव. मी तुझ्याकडे लक्ष केंद्रित करतो आणि मी मुस्लिमांपैकी आहे.
____________________
(१) या दुःख-यातनेचा उल्लेख करून माता-पित्याशी सद्‌वर्तन करण्यावर खास जोर दिला आहे, ज्यावरून हे कळते की माता या सद्‌वर्तनाच्या आदेशात पित्याच्या आधी आहे, कारण सतत नऊ महिने गर्भाचा त्रास आणि नंतर प्रसुतीच्या वेदना फक्त आईच झेलते, तसेच दुग्धपानाची पीडाही एकटी आईच सहन करते, पित्याचा त्यात सहभाग नसतो. यास्तव हदीस वचनात मातेशी सद्‌वर्तन करण्याला प्राधान्य दिले गेले आहे आणि पित्याचा दर्जा त्या नंतरचा सांगितला गेला आहे. एकदा एका निकट सहवासातील अनुयायी (साहबी) ने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विचारले, ‘माझ्या चांगल्या वागणुकीचा सर्वांत जास्त हक्कदार कोण आहे?’ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘तुमची माता.’ त्याने पुन्हा हेच विचारले. पैगंबरांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदाही हेच उत्तर दिले. चौथ्या वेळेस प्रश्न विचारल्यावर पैगंबरांनी फर्माविले, ‘तुमचा पिता’. (सहीह मुस्लिम किताबूल बिर्रेवस्सिला, पहिला अध्याय)
१६. हेच ते लोक होत, ज्यांची सत्कर्मे आम्ही कबूल करतो आणि दुष्कर्मांना माफ करतो, (हे) जन्नतमध्ये दाखल होणाऱ्या लोकांपैकी आहेत, त्या सच्चा वायद्यानुसार, जो त्यांच्याशी केला जात होता.
१७. आणि ज्याने आपल्या माता-पित्यास म्हटले की, धिःक्कार असो तुमचा (मी तुमच्यापासून अगदी बेजार झालो) तुम्ही मला हेच सांगत राहाल की (मी मेल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा) जिवंत केला जाईल, माझ्यापूर्वीही अनेक जनसमूह होऊन गेलेत. ते दोघे अल्लाहच्या दरबारात विनंती (गाऱ्हाणे) करतात, (आणि म्हणतात) वाईट होवो तुझे, तू ईमान राखणारा हो, निःसंशय, अल्लाहचा वायदा सच्चा आहे, तो उत्तर देतो की हे तर केवळ पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचे किस्से आहेत.
१८. (हेच) ते लोक होत, ज्यांच्यावर अल्लाह (च्या अज़ाब) चे फर्मान लागू झाले त्या जिन्न आणि मानवांच्या समूहांसोबत, जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेत हे निश्चितपणे तोट्यात राहिले.
१९. आणि प्रत्येकाला आपापल्या आचरणानुसार दर्जा मिळेल, यासाठी की त्यांना त्यांच्या कर्मांचा पुरेपूर मोबदला द्यावा आणि त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला जाणार नाही.
२०. आणि ज्या दिवशी काफिरांना जहन्नमच्या किनाऱ्याशी आणले जाईल, (तेव्हा सांगितले जाईल) की तुम्ही आपली सत्कर्मे ऐहिक जीवनातच संपवून टाकलीत आणि त्यांच्यापासून लाभ प्राप्त करून घेतला, तेव्हा आज तुम्हाला अपमानदायक शिक्षा-यातनेचा दंड दिला जाईल, या कारणाने की तुम्ही धरतीवर अहंकार करीत होते आणि या कारणानेही की तुम्ही आदेशाचे पालन करीत नव्हते.
२१. आणि आदच्या भावाचे स्मरण करा, जेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना अहकाफमध्ये (वाळूच्या टेकडीवर) खबरदार केले, आणि निःसंशय, त्याच्या पूर्वीही भय दाखविणारे होऊन गेलेत आणि त्याच्या नंतरही की तुम्ही अल्लाहखेरीज दुसऱ्यांची उपासना करू नका. निःसंशय, मला तुमच्याबद्दल मोठ्या दिवसाच्या अज़ाबचे भय वाटते.
२२. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की काय तुम्ही आमच्याजवळ अशासाठी आलात की आम्हाला आमच्या दैवतांची पूजा अर्चना करण्यापासून रोखावे, तेव्हा जर तुम्ही सच्चे असाल तर ज्या शिक्षा - यातनां (अज़ाब) चा तुम्ही वायदा करीत आहात, त्या आमच्यावर आणून सोडा.
२३. (हजरत हूद) म्हणाले, (याचे) ज्ञान तर अल्लाहजवळ आहे. मला तर जो संदेश देऊन पाठविले गेले आहे, तोच तुम्हाला मी पोहचवित आहे, परंतु मी असे पाहतो की तुम्ही मूर्खपणा करीत आहात.
२४. मग जेव्हा त्यांनी अज़ाब (शिक्षा - यातने) ला ढगाच्या स्वरूपात पाहिले आपल्या मैदानांकडे येत असलेला, तेव्हा म्हणू लागले की हा ढग आमच्यावर पाऊस पाडणार आहे (नव्हे), किंबहुना, वस्तुतः हा ढग तो (प्रकोप) आहे ज्याची तुम्ही घाई माजवित होते. ही हवा (वादळ) आहे ज्यात दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) आहे.
२५. जी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने, प्रत्येक वस्तूंचा विध्वंस करून टाकील, तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली की त्यांच्या घरांखेरीज दुसरे काही दिसून येत नव्हते. अपराध्यांच्या समूहाला आम्ही अशाच प्रकारे शिक्षा देतो.
२६. आणि निश्चितपणे आम्ही (आदच्या समुदायाला) ते शक्ती-सामर्थ्य प्रदान केले होते, जे तुम्हाला दिलेच नाही आणि आम्ही त्यांना कान, डोळे आणि हृदयेही देऊन ठेवली होती, परंतु त्यांच्या कांनानी, डोळ्यांनी आणि हृदयांनी त्यांना काहीच लाभ पोहचविला नाही. जेव्हा ते अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित असत, तीच त्यांच्यावर उलटली.
२७. आणि निःसंशय, आम्ही तुमच्या जवळपास (प्रदेशा) च्या वस्त्यांचा नायनाट करून टाकला, आणि (अनेक प्रकारे) आम्ही आपल्या निशाण्या सादर केल्या, यासाठी की त्यांनी (अल्लाहकडे) वळावे.
२८. तेव्हा अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करण्याकरिता त्यांनी ज्यांना ज्यांना उपास्य (दैवत) बनवून ठेवले होते, त्यांनी त्यांची मदत का नाही केली, किंबहुना ते तर त्यांच्यापासून हरवले गेलेत (वस्तुतः) हे त्यांचे केवळ असत्य आणि (पूर्णतः) मिथ्यारोप होता.
२९. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही जिन्नांचा एक समूह तुमच्याकडे वळविला, यासाठी की त्यांनी कुरआन ऐकावे, तर जेव्हा ते पैगंबरांजवळ पोहचले, तेव्हा (एकमेकांना) म्हणू लागले की गप्प राहा. मग जेव्हा पठण समाप्त झाले तेव्हा आपल्या जनसमूहाच्या लोकांना खबरदार करण्याकरिता परतले.
३०. म्हणाले, हे आमच्या जनसमूहाच्या लोकांनो! आम्ही खात्रीने तो ग्रंथ ऐकला आहे, जो मूसा (अलै.) नंतर अवतरित केला गेला आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथाची पुष्टी करणारा आहे, जो सत्य-धर्म आणि सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो.
३१. हे आमच्या जातीसमूहाच्या लोकांनो! अल्लाहकडे बोलविणाऱ्याचे म्हणणे मान्य करा, त्याच्यावर ईमान राखा, तर (अल्लाह) तुमचे काही अपराध माफ करील आणि तुम्हाला दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातने) पासून वाचवील.
३२. आणि जो मनुष्य अल्लाहकडे बोलविणाऱ्याचे म्हणणे मानणार नाही तर तो जमिनीवर कोठेही (पळून जाऊन अल्लाहला) लाचार करू शकत नाही आणि ना अल्लाहखेरीज त्याला कोणी मदत करणारा असेल, हे लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत.
३३. काय ते नाही पाहत की ज्या अल्लाहने आकाशांना व धरतीला निर्माण केले आहे आणि त्यांची निर्मिती करून तो थकला नाही, तो निःसंशय मृतांना जिवंत करण्याचे सामर्थ्य बाळगतो, का नव्हे? निःसंशय, तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
३४. आणि ते लोक ज्यांनी कुप्र (इन्कार) केला ज्या दिवशी जहन्नमच्या समोर आणले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) की काय हे सत्य नाही? तेव्हा ते उत्तर देतील की होय, का नव्हे? शपथ आहे आमच्या पालनकर्त्याची (हे अगदी सत्य आहे). (अल्लाह) फर्माविल की आता आपल्या इन्काराच्या मोबदल्यात अज़ाबचा स्वाद चाखा.
३५. तेव्हा (हे पैगंबरा!) तुम्ही असे धैर्य राखा, जसे धैर्य दृढसंकल्प आणि साहस बाळगणाऱ्या पैगंबरांनी राखले, आणि त्यांच्यासाठी (शिक्षा मागण्यात) घाई करू नका. हे ज्या दिवशी तो अज़ाब पाहून घेतील ज्याचा वायदा त्यांना दिला जात आहे, तेव्हा (त्यांना हे जाणवू लागेल की) दिवसाची एक घटिका मात्र (ते जगात) राहिले होते. हे आहे संदेश पोहचविणे. दुराचारी लोकांखेरीज कोणी नष्ट केला जाणार नाही.
Icon