ترجمة سورة إبراهيم

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة إبراهيم باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. आलिफ. लाम.रॉ हा (सर्वांत उत्तम) ग्रंथ आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे, यासाठी की तुम्ही लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणावे त्यांच्या पालनकर्त्याच्या आदेशाने जबरदस्त, प्रशंसनीय अल्लाहच्या मार्गाकडे.
२. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे आणि काफिर (कृतघ्न) लोकांसाठी सक्त अज़ाबाचे संकट आहे.
३. जे लोक आखिरत (परलोक) च्या तुलनेत ऐहिक जीवनाचा मोह धरतात आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात वक्रता निर्माण करू इच्छितात, हेच लोक मोठ्या दूरच्या मार्गभ्रष्टतेत आहेत.
४. आणि आम्ही प्रत्येक पैगंबराला त्याच्या जनसमूहाच्या भाषेतच पाठविले आहे यासाठी की जनसमूहाच्या लोकांसमोर स्पष्टपणे सांगावे, आता अल्लाह ज्याला इच्छिल मार्गभ्रष्ट करील आणि ज्याला इच्छिल मार्ग दाखविल. तो मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे.
५. (स्मरण करा जेव्हा) आम्ही मूसाला आपल्या निशाण्या देऊन पाठविले की तू आपल्या जनसमूहाच्या लोकांना अंधारातून काढून उजेडात आण आणि त्यांना अल्लाहच्या उपकारांची आठवण करून दे. यात निशाण्या आहेत प्रत्येक धीर-संयम राखणाऱ्याकरिता.
६. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, की अल्लाहच्या त्या कृपा देणग्यांची आठवण करा ज्या त्याने तुम्हाला दिल्या आहेत, जेव्हा त्याने तुम्हाला फिरऔनच्या साथीदारांपासून सोडविले जे तुम्हाला फार दुःख पोहचवित होते. तुमच्या पुत्रांची हत्या करीत आणि तुमच्या मुलींना जिवंत सोडून देत. यात तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमची फार मोठी कसोटी होती.
७. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने सचेत केले की जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर निःसंशय मी तुम्हाला आणखी जास्त प्रदान करेन आणि जर तुम्ही कृतघ्न व्हाल तर निश्चितच माझी शिक्षा-यातना मोठी सक्त आहे.
८. आणि मूसा म्हणाले, जर तुम्ही सर्व आणि धरतीवर राहणारे समस्त लोक अल्लाहशी कृतघ्न होतील, तरीही अल्लाह निःस्वार्थ आणि प्रशंसनीय आहे.
९. काय तुमच्याजवळ, तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा वृत्तांत आला नाही? अर्थात नूहच्या जनसमूहाचा, आणि आद व समूदचा आणि त्यांच्यानंतरच्या लोकांचा, ज्यांना अल्लाहशिवाय दुसरा कोणीही जाणत नाही. त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर चमत्कार घेऊन आले, परंतु त्यांनी आपले हात आपल्या तोंडावर ठेवून घेतले आणि स्पष्टपणे सांगून टाकले की जे काही देऊन तुम्हाला पाठविले गेले आहे आम्ही ते मानत नाही आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही आम्हाला बोलवित आहात, आम्हाला तर त्यात फार शंका वाटते (आमचा त्यावर विश्वास नाही).
१०. त्यांचे पैगंबर त्यांना म्हणाले की काय अल्लाह (जो सत्य आहे) त्याच्याविषयी शंका आहे, जो आकाशांचा व धरतीचा निर्माण करणारा आहे तो तर तुम्हाला अशासाठी बोलावित आहे की त्याने तुमचे सर्व अपराध माफ करावेत आणि एक ठरलेल्या अवधीपर्यंत तुम्हाला संधी प्रदान करावी ते (लोक) म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच मानव आहात. तुम्ही हे इच्छिता की आम्हाला त्या दैवतांच्या पूजा-अर्चनेपासून रोखावे, ज्यांची भक्ती-आराधना आमचे वाडवडील करत राहिले, बरे तर आमच्यासमोर एखादे स्पष्ट प्रमाण तरी सादर करा.
११. त्यांचे पैगंबर त्यांना म्हणाले, हे अगदी सत्य आहे की आम्ही तुमच्यासारखे मानव आहोत. परंतु सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याच्यावर इच्छितो आपली कृपा करतो. आमची ताकद नाही की आम्ही अल्लाहच्या हुकुमाविना एखादा मोजिजा (चमत्कार) तुम्हाला दाखवावा आणि ईमान राखणाऱ्यांनी केवळ अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे.
१२. आणि शेवटी काय सबब आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहवर भरोसा न ठेवावा? वास्तविक त्यानेच आम्हाला आमचा मार्ग दाखविला आहे आणि जे दुःख तुम्ही आम्हाला पोहोचवाल, आम्ही त्यावर निश्चितच धीर-संयम राखू. भरोसा ठेवणाऱ्यांसाठी हेच योग्य आहे की त्यांनी अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे.
१३. आणि इन्कारी लोक आपल्या पैगंबरांना म्हणाले की आम्ही तुम्हाला देशाबाहेर घालवून देऊ किंवा तुम्ही पुन्हा आमच्या धर्मात परत या. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्याकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की आम्ही त्या अत्याचारी लोकांचाच नाश करून टाकू.
१४. आणि त्यानंतर आम्ही स्वतः तुम्हाला धरतीवर आबाद करू. हे अशा लोकांसाठी आहे, जे माझ्यासमोर उभे राहण्यापासून भित राहिले आणि माझ्या चेतावणीचे भय बाळगत राहिले.
१५. आणि त्यांनी निर्णय मागितला, आणि सर्व विद्रोही जिद्दी लोक असफल झाले.
१६. त्यांच्यासमोर जहन्नम आहे, जिथे त्यांना पीप (पू) चे पाणी पाजले जाईल.१
____________________
(१) पीप किंवा पू ते रक्त होय, जे नरकात जाणाऱ्यांच्या मांस आणि त्वचेतून वाहत राहिले असेल. काही हदीस वचनात याला ‘उसारतु अहलिन्नारी’ (मुसनद अहमद, भाग ५, पृ.१७१) (जहन्नमी लोकांच्या शरीरातून पिळून काढलेले) आणि काही हदीस वचनानुसार हे इतके गरम आणि उकळते असेल की त्यांच्या तोंडापर्यंत पोहोचताच त्यांच्या चेहऱ्यावरील त्वचा होरपळून गळून पडेल आणि एक एक घोट पिताच पोटातल्या आतड्या मल विसर्जनाच्या मार्गाने बाहेर पडतील.
१७. ज्याला तो मोठ्या त्रासाने एक एक घोट करू प्यायचा प्रयत्न करील तरीही ते घशाखाली उतरवू शकणार नाही. आणि त्याला सगळीकडून मृत्यु येत असलेला दिसेल, परंतु तो मरणार नाही. त्याच्या पाठोपाठ सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
१८. त्या लोकांचे उदाहरण ज्यांनी आपल्या पालनकर्त्याचा इन्कार केला त्यांचे कर्म त्या राखेसारखे आहे, जिच्यावर वेगवान वारा वादळाच्या दिवशी चालावा. जे काही त्यांनी केले, त्यापैकी कोणत्याही गोष्टीवर समर्थ नसतील. हीच दूरची मार्गभ्रष्टता आहे.
१९. काय तुम्ही नाही पाहिले की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आकाशांना आणि धरतीला सर्वोत्तम उपाययोजनेद्वारे निर्माण केले आहे. जर त्याने इच्छिले तर तुम्हा सर्वांना नष्ट करून टाकील आणि नवीन निर्मिती (सृष्टी) आणील.
२०. आणि अल्लाहकरिता असे करणे काहीच कठीण नाही.
२१. आणि सर्वच्या सर्व अल्लाहसमोर उभे राहतील. त्या वेळी कमजोर लोक घमेंडी लोकांना म्हणतील की आम्ही तर तुमच्या अधीन होतो, तर काय तुम्ही अल्लाहच्या शिक्षा-यातनांमधून थोडी सजा आमच्यावरून दूर करू शकणारे आहात? ते उत्तर देतील की जर अल्लाहने आम्हाला मार्गदर्शन केले असते तर आम्हीही तुम्हाला मार्ग दाखविला असता. आता तर आमच्यासाठी बेचैन होणे आणि सबुरी राखणे दोन्ही सारखेच आहे. आमच्याकरिता सुटकेचा कोणताही मार्ग नाही.
२२. आणि जेव्हा कार्याचा निर्णय लावला जाईल तेव्हा सैतान म्हणेल की अल्लाहने तर तुम्हाला सत्यवचन दिले होते आणि मी तुम्हाला जो वायदा दिला, त्याच्याविरूद्ध केले. माझा तुमच्यावर काही जोर तर नव्हताच. हो, मी तुम्हाला पुकारले आणि तुम्ही माझे म्हणणे मान्य केले. आता तुम्ही माझ्यावर दोषारोप ठेवू नका, उलट स्वतःचाच धिःक्कार करा. मी ना तुमची मदत करू शकतो, ना तुम्ही माझे गाऱ्हाणे दूर करू शकता. मी तर (सुरुवातीपासून) मानतच नाही की तुम्ही मला यापूर्वी अल्लाहचा सहभागी समजत राहिले. निःसंशय अत्याचारी लोकांसाठी दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
२३. आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत तर त्यांना जन्नतींमध्ये दाखल केले जाईल, ज्यांच्यात नहरी (प्रवाह) वाहत आहेत, जिथे ते आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने नेहमी नेहमी राहतील जिथे त्यांचे स्वागत सतत सलामने होईल.
२४. काय तुम्ही नाही पाहिले की सर्वश्रेष्ठ अल्लाहने पवित्र गोष्टीचे उदाहरण एका पवित्र वृक्षासमान सांगितले, ज्याचे मूळ मजबूत आहे आणि ज्याच्या फांद्या आकाशात आहेत.
२५. जो आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने प्रत्येक वेळी आपले फळ देतो१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह लोकांसमोर उदाहरण प्रस्तुत करतो यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा.
____________________
(१) याचा अर्थ असा की ईमानधारकांचे उदाहरण त्या झाडासारखे आहे जे उन्हाळा, हिवाळा अशा प्रत्येक त्रऋतुत फळ देते. अशा प्रकारे ईमानधारकांची सत्कर्मे रात्रंदिवस प्रत्येक क्षणी आकाशाकडे नेली जातात. पवित्र वचनाशी अभिप्रेत इस्लाम किंवा ‘ला इलाह इल्लल्लाह’ आणि पवित्र वृक्षाशी अभिप्रेत खजुरीचे झाड होय, जसे की हदीसद्वारे सिद्ध आहे. (सहीह बुखारी, किताबिल इल्म, बाबूल फहम फिल इल्म आणि सहीह मुस्लिम, किताबुल सिफतिल कियामा, बाब मिस्लुल मोमिन, मिस्लुल नख्लाः)
२६. आणि अपवित्र व अमंगल गोष्टीची तुलना गलिच्छ वृक्षासारखी आहे, जे जमिनीच्या किंचित वरच्याच भागातून उखडून घेतले गेले त्याला कसलीही मजबूती (स्थिरता) नाही.१
____________________
(१) ‘वाईट वचन’शी अभिप्रेत कुप्र आणि ‘वाईट झाडा’शी अभिप्रेत इन्द्रायणाचे झाड होय, ज्याचे मूळ जमिनीच्या वरच्या भागातच असते आणि मामुली झटक्याने उखटले जाते. तद्‌वतच ईमान न राखणाऱ्याच्या कर्माचे काहीच मूल्य नाही. ना ते आकाशात जाते आणि ना अल्लाहच्या दरबारात स्वीकारले जाते.
२७. ईमान राखणाऱ्यांना सर्वश्रेष्ठ अल्लाह पक्क्या व मजबूत गोष्टींसह कायम राखतो. या जगाच्या जीवनातही आणि आखिरतमध्येही तथापि अत्याचारी लोकांना अल्लाह मार्गभ्रष्ट करतो आणि अल्लाह जे इच्छितो ते करतोच.
२८. काय तुम्ही त्यांच्यावर नजर नाही टाकली ज्यांनी अल्लाहच्या कृपा-देणगीच्या बदल्यात कृतघ्नता व्यक्त केली आणि आपल्या जनसमूहाला विनाशाच्या घरात आणून उतरविले.
२९. अर्थात जहन्नममध्ये, ज्यात हे सर्व जातील, ते फार वाईट ठिकाण आहे.
३०. आणि त्यांनी अल्लाहचे समकक्ष बनवून घेतले यासाठी की लोकांना अल्लाहच्या मार्गापासून विचलित करावे. (तुम्ही) सांगा की ठीक आहे, मौज-मस्ती करून घ्या. तुमचे ठिकाण तर शेवटी जहन्नम (नरक) च आहे.
३१. माझ्या ईमान राखणाऱ्या दासांना सांगा की त्यांनी नमाजला कायम राखावे आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून काही गुप्तपणे आणि उघडपणे खर्च करीत राहावे, यापूर्वी की तो दिवस यावा ज्यात ना कसली खरेदी-विक्री होईल, ना मैत्री ना प्रेम.
३२. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना आणि धरतीला निर्माण केले आहे आणि आकाशातून पाऊस पाडून त्याद्वारे तुमच्या रोजी (अन्नसामुग्री) करिता फळे काढलीत आणि नौकांना तुमच्या अधीन केले की नद्यांमध्ये त्याच्या आदेशाने चालाव्यात. त्यानेच नद्या आणि कालव्यांना तुमच्या ताब्यात करून दिले आहे.
३३. त्यानेच तुमच्यासाठी सूर्य आणि चंद्राला अधीन केले आहे की ते सतत चालत (गतीशील) राहतात. आणि रात्र व दिवसाला तुमच्या कामी लावले आहे.
३४. आणि त्यानेच तुम्हाला तुम्ही मागितलेल्या सर्व वस्तूंपैकी देऊन ठेवल्या आहेत. जर तुम्ही अल्लाहच्या कृपा-देणग्यांची गणना करू इच्छित असाल तर पुरेपूर गणना करूच शकत नाही. निःसंशय मनुष्य मोठा अत्याचारी आणि कृतघ्न आहे.
३५. (इब्राहीमच्या या दुआ-प्रार्थनेचेही स्मरण करा) जेव्हा इब्राहीम म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! या शहराला शांती-सलामतीचे स्थळ बनव. आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तीपूजा करण्यापासून वाचव.
३६. हे माझ्या पालनकर्त्या! त्यांनी अनेक लोकांना सरळ मार्गापासून दूर केले आहे. आता जो माझे अनुसरण करील तो माझा आणि आणि जो अवज्ञा करील तर तू मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.
३७. हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या काही संततीला या नापीक ओसाड जंगलात तुझ्या पवित्र घराच्या जवळ आबाद केले आहे. हे माझ्या पालनकर्त्या! हे अशासाठी की त्यांनी नमाज कायम करावी, यास्तव तू काही लोकांची मने त्यांच्याकडे आकर्षित कर आणि त्यांना फळांची रोजी (अन्नसामुग्री) प्रदान कर, यासाठी की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी.
३८. हे आमच्या पालनकर्त्या! तू चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही आम्ही लपवितो आणि जे जाहीर करतो. धरती आणि आकाशातील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही.
३९. अल्लाहची प्रशंसा आहे, ज्याने मला वृक्षावस्थेत इस्माईल आणि इसहाक प्रदान केले. निःसंशय माझा पालनकर्ता (अल्लाह) दुआ-प्रार्थना ऐकणारा आहे.
४०. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या संततीला नमाज कायम राखणारा बनव. माझ्या पालनकर्त्या! माझी दुआ कबूल कर.
४१. हे आमच्या पालनकर्त्या! मला क्षमा प्रदान कर आणि माझ्या माता-पित्यासह माफ कर आणि इतर ईमान राखणाऱ्यांनाही माफ कर, ज्या दिवशी (कर्मांचा) हिशोब होईल.
४२. अत्याचारी लोकांच्या कर्मांपासून अल्लाहला बेखबर समजू नका त्याने तर त्यांना त्या दिवसापर्यंत संधी देऊन ठेवली आहे, ज्या दिवशी डोळे विस्फारलेले(फाटलेल)ेे राहतील.
४३. ते आपले डोके वर काढून धावपळ करत असतील. स्वतः आपल्याकडेही त्यांची दृष्टी परतणार नाही आणि त्यांची मने उडत आणि पडत जात (शून्य) असतील.
४४. आणि लोकांना त्या दिवसापासून सावध करा जेव्हा त्यांच्याजवळ अज़ाब (शिक्षा-यातना) येऊन पोहोचेल आणि अत्याचारी लोक म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला फार थोड्या जवळच्या वेळेपर्यंतच संधी प्रदान कर की आम्ही तुझे निमंत्रण (दावत) मान्य करावे आणि तुझ्या पैगंबरांच्या अनुसरणात मग्न व्हावे. काय तुम्ही याच्या पूर्वीही शपथ घेत नव्हते की तुम्हाला या जगातून टळायचेच नाही.
४५. आणि काय तुम्ही त्या लोकांच्या घरात राहत नव्हते, ज्यांनी आपल्या प्राणांवर जुलूम केला आणि काय तुम्हाला तो मामला उघडपणे कळला नाही की आम्ही त्यांच्याशी कशा प्रकारचा व्यवहार केला? आम्ही तर तुम्हाला समजाविण्यासाठी अनेक उदाहरणे सादर केलीत.
४६. आणि हे आपले डावपेच खेळत आहेत आणि अल्लाहला त्यांच्या सर्व डावपेचांचे ज्ञान आहे. त्यांचे डाव पेच असे नव्हते की त्यांच्यामुळे पर्वतांनी आपली जागा सोडली असती.
४७. तुम्ही असा विचार कधीही करू नका की अल्लाह आपल्या पैगंबरांशी केलेल्या वायद्याविरूद्ध जाईल. अल्लाह मोठा जबरदस्त आणि सूड घेणारा आहे.
४८. ज्या दिवशी ही जमीन एका दुसऱ्या जमिनीच्या स्वरूपात बदलून टाकली जाईल आणि आकाशांनाही आणि सर्वच्या सर्व जबरदस्त अशा अल्लाहच्या समोर असतील.
४९. आणि तुम्ही त्या दिवशी अपराधी लोकांना पाहाल की साखळ्यांमध्ये एकत्रपणे एका ठिकाणी जखडलेले असतील.
५०. त्यांचे कपडे गंधकाचे असतील आणि त्यांच्या तोंडावर आग पाखडलेली असेल.
५१. हे अशासाठी की, सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रत्येक माणसाला त्याने केलेल्या कर्माचा मोबदला द्यावा. निःसंशय, हिशोब घेण्यात अल्लाहला उशीर लागणार नाही.
५२. हा कुरआन, समस्त लोकांकरिता सूचनापत्र आहे की याच्याद्वारे लोकांना सचेत केले जावे आणि त्यांनी पूर्णपणे हे जाणून घ्यावे की अल्लाह एकमेव उपासनेस पात्र आहे आणि यासाठी की बुद्धिमान लोकांनी विचार चिंतन करावे.
Icon